

'होतील बहु, असतील बहु पण या सम हाच' असेच वर्णन मावळते जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांच्याबाबत करावे लागेल.जळगाव व लातूरची जिल्हा परिषदेची कारकिर्द गाजवून डॉ.गेडाम हे उस्मानाबादला तीन वर्षापुर्वी उस्मानाबादला जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते.त्यावेळी लोकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि अपेक्षा पुर्ण करण्यात डॉ.गेडाम यशस्वी ठरले आहेत. डॉ.गेडाम यांनी सर्वप्रथम बेशिस्त बनलेल्या महसूल यंत्रणेला शिस्त लावली.त्यानंतर त्यांनी गोरगरिबांच्या अन्नावर गदा आणणा-या स्वस्त धान्य दुकानदारांविरूध्द मोहिम उघडली.बोगस शिधा पत्रिकेला आळा घातला.त्यामुळे गोरगरिब जनतेला स्वस्त धान्य दुकानात धान्य व रॉकेल मिळू लागले.त्यानंतर त्यांनी दहावी, बारावी परिक्षेत चालणा-या कॉपीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली. सर्वात लक्षवेधी काम तुळजापूरच्या तुळजाभवानी तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी केले.तुळजापूरला ३७० कोटी रूपयाचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे होते.रस्ते रूंद करणे, विविध इमारती बांधणे, भाविकांसाठी विविध योजना राबविणे गरजेचे होते.डॉ.गेडाम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम केले.त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिरात पुजा-यांची जी दादागिरी चालू होती, तीही त्यांनी हाणून पाडली.मंदिरात चालणारा विविध भ्रष्टाचारालाही लगाम घातला.तुळजाभवानी मंदिराची जमिन काही लोकांनी लाटली होती, तीही काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अनेक पुढा-यांनी व शिक्षण सम्राटांनी शासकीय जमिनींचा गैरवापर करून, भुखंडाचे श्रीखंड केले होते.त्यावरही डॉ.गेडाम यांनी जाता - जाता हिवराची मेख मारली.त्यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनता अत्यंत खूष होती.असा जिल्हाधिकारी आम्ही पाहिला नव्हता, अश्याच प्रतिक्रिया उमटत होत्या.त्यांच्या कारकिदीत जी शासकीय नोकर भरती झाली, ती अत्यंत पारदर्शक होती.त्यांच्याकडे तक्रार घेवून जाणारा व्यक्ती निश्चितच समाधानी होत होता.जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जो आपला कामाचा ठसा उमटाविला आहे, तो यापुर्वी कोणीच उमटाविला नाही.जिल्हाधिकारी पदाची किंमत ख-या अर्थाने जनतेला कळाली होती.त्यांच्या मोहिमेमुळे भ्रष्ट पुढारी व कामचुकार कर्मचारी धास्तावले होते. त्यांची बदली करू नये, त्यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी करूनही शासनाने त्यांची पुण्याला बदली केली.त्यांच्या बदलीमुळे काही मुठभर पुढारी आनंदीत झाले असले तरी, बहुतांश जनता नाराज आहे.जनतेत एक प्रकारची संतापाची लाट निर्माण झाली आहे. असो, डॉ.गेडाम यांनी उस्मानाबादला जे काम केले, ते जनता कधीच विसरू शकत नाही.जिल्ह्यातील जनता हमेशा त्यांना मिस् करेल, यात शंका नाही.
*स्वत:च्या घरी टँकर न मागविणारा जिल्हाधिकारी... उस्मानाबाद शहर व जिल्ह्यात एप्रिल, मे मध्ये भीषण पाणीटंचाई होती.जिल्ह्यात अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा चालू होता. हे टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना आहेत. उस्मानाबादेतही आठ दिवसांतून एकदा नळ पाणी पुरवठा चालू आहे.त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.या पाणी टंचाईची झळ दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनाही बसली.त्यांच्या बंगल्यात कुपनलिका आहे, मात्र त्याचे पाणी कमी झाले आहे.नळाला तर आठ दिवसांतून एकदा पाणी येते.त्यांच्या घरात पाणी टंचाई आहे.मनात आणले असते तर ते दररोज टँकरने पाणी मागविले असते.मागील जिल्हाधिकारी पाणी टँचाईच्या काळात टँकर मागवत असत.मात्र डॉ.गेडाम यांनी कधीच टँकर न मागवता, आहे त्या पाण्याची बचत करून दिवस काढले. ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर सत्यता आहे.डॉ.गेडाम यांच्या मातोश्री लक्ष्मीकमल गेडाम या प्रसिध्द लेखिका व गीतकार आहेत.त्यांच्या निसर्ग हिंदोळा या गीताच्या सीडीच्या वेळी त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तेव्हा ही अनुभूती आली. आई लक्ष्मीकमल यांना पाणी टंचाईबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत प्लीज पेपरात लिहू नका, असे आम्हाला बजावले होते.मात्र आम्हाला राहवत नाही, म्हणून ही वस्तुस्थिती लिहित आहे.यावरून स्पष्ट होते की, जिल्हाधिकारी डॉ.गेडाम किती आपल्या कामाशी प्रामाणिक होते.त्यांनी आपल्या पदाचा कधीच गैरवापर केला नाही.असा जिल्हाधिकारी उस्मानाबादला लाभला, हे उस्मानाबादकरांचे नशिबच समजावे लागेल.
* नव्या बंगल्याचे कामही थांबविले उस्मानाबाच्या जिल्हाधिका-यांचा संध्याचा बंगला खूप पुरातण आहे.त्यामुळे आहे त्या बंगल्याजवळ नव्या बंगल्याचे काम गेल्या काही महिन्यापासून चालू आहे.मात्र पाणी टंचाईमुळे या बंगल्याचे काम काही महिन्यापुर्वी थांबविण्यात आले आहे. हा या नव्या बंगल्यात पहिला प्रवेश डॉ.गेडाम यांचा होईल, असे वाटले होते,मात्र याचा हव्यास डॉ.गेडाम यांना नव्हता.अन्यथा टँकरने पाणी आणून या बंगल्याचे काम मागेच पुर्ण करता आले असते.
डॉ.गेडाम यांना उस्मानाबाद लाइव्हचा मानाचा मुजरा...
हेच फळ का ? डॉ.प्रवीण गेडाम यांनी उस्मानाबादला तीन वर्षे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत चांगले काम केले.त्यांच्या कामावर उस्मानाबादची जनता अत्यंत खूष होती.मात्र कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.गेडाम यांना नाउमेद करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे.त्यांची भूजल सर्व्हेक्षण खात्याचे संचालक म्हणून पुण्याला बदली करण्यात आली आहे.हे कार्यालय अत्यंत छोटे असून, काम करण्यास कसलाच वाव नाही.उस्मानाबादला चांगले काम केलेले हेच फळ का, असा प्रश्न कधी- कधी पडत आहे.त्यांची अन्यत्र जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असती तर, त्यांनी आपली झलक आणखी दाखविली असती...मात्र राज्यकर्त्यांना ते नको आहे....
* सुनील ढेपे
|